राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द; शिक्षणमंत्र्यांची घोषणा !



  • अखेर तिढा सुटला !

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा आधी लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता, मात्र राज्यातील करोना संक्रमणाच्या बिघडत जाणाऱ्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय सोशल मिडियाद्वारे जाहीर केला. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कसा तयार करायचा याबाबतचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील.

देशातील इतर सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. देशातील राष्ट्रीय पातळीवरील मंडळ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने तसेच आयसीएसई बोर्डाने देखील दहावीची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सर्व बोर्डांच्या निर्णयांमध्ये समानता राहावी म्हणून राज्य मंडळाची देखील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाल्या, '१२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती, त्यात सर्वानुमते दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य बोर्डांनीही त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आला, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला. बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाची असते, त्यामुळे बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

दहावीचे जे विद्यार्थी त्यांच्या गुणांबाबत समाधानी नसतील, त्यांना गुण सुधारण्याची संधी दिली जाईल. यासंबंधी कशा पद्धतीने कार्यवाही होईल, त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय जाहीर केला जाईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या परीक्षा रद्दच्या निर्णयासंबंधी माहिती दिली. सीबीएसई आणि आयसीएसई प्रमाणेच राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील सात राज्यांमध्ये परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. बारावीच्या परीक्षा होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments