होय साहेब... ? तणाव आहे पण...!!



सध्या देश एका अदृश्य विषाणूच्या भयावह आजाराला सामोरे जात आहे. अपुरी आरोग्य यंत्रणा व लाचार शासन-प्रशासनाच्या नागड्या व्यवस्थेचे वाभाडे निघालेले आहेत. कोरोना आजाराला रोखण्यात असमर्थ ठरलेल्या शासन व प्रशासनाचे धिंडवडे निघाले आहेत. संपूर्ण प्रशासन व शासन प्रणालीवर ताण असल्याचे सांगण्यात येत आहे आणि दिसत ही आहे (?). शासन-प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे मृत्यूला ओढावणाऱ्या 'त्या' निष्पापाच्या मृतदेहांसमोर त्यांचे कुटुंब व्यवस्थेच्या नियोजनशून्यतेवर "बोटे मोडीत" आहेत, त्या निष्पांपाचा दोष काय हो...! आणि त्यांच्यावर एकाएकी कोसळलेल्या या संकटामुळे त्याचे मागे राहिलेले कुटूंबावरील ताण समजणारा जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीत आहे कां कोणी वाली?



कोण बरे दोषी असेल 
'नागराज' च्या मृत्यूला...!

चंद्रपूरातील एका खाजगी शेअर कंपनीमध्ये (या व्यवसायाचा दांडगा अनुभव असलेला) कार्यरत नागराज, अंदाजे ४५ च्या दरम्यान असलेला तरूण युवक! पत्नी, ४ व १ वर्षाच्या दोन मुली असे सुखी कुटुंब! म्हातारे आई-वडील व नोकरी करणारा लहान भाऊ दुसऱ्या जिल्ह्यात रहायचा. मागील काही दिवसांपासून त्याला बरे नव्हते. ताप यायचा, परंतु अन्य लोकांनी केलेली चुक "नागराज"ने ही केली. अदृष्य विषाणूच्या अवास्तव पाय पसरविलेल्या भयाने घरीच औषधोपचार करीत राहिला. (प्रत्येक सामान्यांच्या मनात ही भिती टाकली कुणी आणि आता त्याला बाहेर काढणार कोण?) प्रकृती खालावत गेली. पत्नी व मुलांच्या चिंतेने ती आणखीनचं खालावली. नात्याला भेग पाडणाऱ्या या आजारात ही "नागराज" चे काही परोपकारी नातेवाईक त्याच्या मदतीला धावून गेले. खाजगी मध्ये उपचार करण्यासाठी धावपळ करीत राहिले. देव समजणाऱ्या चंद्रपूरातील डॉक्टरांनी त्यांचा फिक्स असलेला दर सांगीतला व जवळपास ५० हजार पुर्वीचं जमा करावे लागेल, अश्या परोपकारी सुचना ही दिल्या. नातेवाईकांनी रूग्णाला दाखल करा, शक्य तेवढ्या लवकर रकमेचा बंदोबस्त करण्याची विनंती केली परंतु स्थिती समजणारे ते डॉक्टर कसले ? नातेवाईकांनी दुसऱ्या दिवसांपर्यंत काही जमवाजमव केली. ज्या ठिकाणी विचारपूस केली होती, त्यातील काही डॉक्टरांकडे २४ एप्रिल ला घेऊन गेले, समळ्यांनी नकार दिला. भ्यालेला नागराज प्रकृतीने ही ढासळलेला तर होताचं परंतु कुटुंबाच्या चिंतेने ही ग्रासलेला होता. अखेर २४ एप्रिल रोजी त्याला चंद्रपूर च्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही तासानंतर डॉक्टरांनी त्याला हात लावले, ऑक्सीजन ची पातळी खालावली होती. कंच्युलिटी मध्ये बेडवर त्याला लेटविण्यात आले. इकडून-तिकडून फोन केल्यानंतर ऑक्सीजन लावण्यात आले व डॉक्टर ने त्याला रेमिडेसिवर इंजेक्शन ची मात्रा द्यावी लागेल, असे म्हणून ६ रेमिडेसिवर लिहुन दिले. नातलगांची रेमेडिसिवीर साठी धावपळ सुरू झाली, चार हजार रूपयांचा खाजगी मध्ये दर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकावेळी सहा रेमेडिसिवर कसे काय ? असा प्रश्न सुज्ञांना पडला. काही परिचितांकडून एका पत्रकाराच्या माध्यमातून रूग्णाची प्रकृती व परिस्थितीची जाणिव शल्य चिकीत्सकांना दिली. रूग्णालयात आत्ता रेमेडिसीवर उपलब्ध आहेत. दोन चा डोज पुर्वी द्यावा लागेल, डॉक्टरांनी एकावेळी सहा कसे दिसुन दिले, असा संताप व्यक्त करीत मी तसा बंदोबस्त करून देतो असे आश्वासन दिले. शल्य चिकीत्सकांनी आश्वासन दिल्यामुळे रूग्ण थोडा बहु कां असेना उपचाराला साथ देईल, कुटूंबिय आश्वस्त झाले. रेमेडिसीवर मिळणारचं असे शल्यचिकीत्सकांनी विश्वास दाखविला. रात्री १२ वाजताच्या सुमारास नागराज ने शेवटचा श्वास घेतला. रेमेडेसिवर बाबत चौकशी केली असता तो सायंकाळच्या सुमारासचं ड्युटीवर असलेल्या डॉक्टर ला रूग्णांसाठी देण्यात आला असल्याचे कळले परंतु तो डोज मृत होईपावेतो रूग्णाला मिळालाचं नाही, रेमेडेसिवर मधातचं कुठे गायब झाला ते मात्र कळले नाही. रेमेडेसिवरचा आधाराने रूग्ण वाचू शकला असता अशी अपेक्षा आज ही त्या कुटुंबाला वाटत आहे. नागराज च्या मृत्यूनंतर त्याची पत्नी, ४ वर्षाची मोठी व १ वर्षाची लहान मुलगी यांचे काय? त्यांच्या बाकीचे आयुष्य कसे निघणार याची चिंता करणारा मात्र आज कुणीच नाही. होय साहेब.....! तणाव आहे पण....! या प्रश्नाचे उत्तर कोण देणार ?

वृत्त लिहीत असतांना नागराज ची पॉझिटिब्ह पत्नी व १ वर्षाची लहान मुलगी संस्थात्मक विलगीकरणातून घरी आल्या असल्याचे कळले. परंतु घरमालकाने त्यांना पुर्वीच घरात राहण्यास मज्जाव केल्यामुळे त्या आता एका नातेवाईकांच्या घरी वास्तव्यास आहे. कुठे गेली असेल बरे माणूसकी...!

Post a Comment

0 Comments