कोरोनाच्या संभाव्य उद्रेकाला लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेचे प्रशिक्षण सुरू

निराधार, निराश्रित, बेघर, विमनस्क यांच्या भोजनाच्या व्यवस्थेकडे शासनाचे लक्ष

✨ घरातून बाहेर पडून परिवार व समाजाला धोक्यात घालू नका
✨ 14 एप्रिल पर्यंत घरात बसून राहणे कोरोना प्रतिबंधाचा एकमेव उपाय
✨ खासगी दवाखाने सुरू करण्याचे प्रशासनाचे आवाहन
✨ चंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
✨ जिल्ह्यामध्ये विदेशातून आलेले 43 नागरिक निगराणीत
✨ होम कॉरेन्टाईनमधून आज मुक्त झालेले नागरिक 61
✨ सध्या इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन रुग्णाची संख्या ६
✨ शहर व ग्रामीण भागात रेशन दुकानातून  वितरण सुरू
✨ शहरातील जीवनावश्यक दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील
✨ आरटीओ मार्फत अत्यावश्यक वाहनांना परवाना देण्याचे काम सुरू
✨ चंद्रपूर मनपा मार्फत कम्युनिटी किचनला सुरुवात
✨ जिल्ह्यातील खाद्यतेलाच्या कारखान्याना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश
✨ नागरिकांनी आवश्यक हेल्पलाईनचा वापर करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि.२८ मार्च : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यास येत्या काही दिवसात अतिशय विदारक परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशावेळी शेकडो रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आरोग्य यंत्रणेवर येईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र आपल्या आजूबाजूच्या समाजावर ही वेळ येऊच नये, यासाठी केवळ आणि केवळ घरात राहणे हाच उपचार असल्याचे आवाहन पुन्हा एकदा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज केले आहे.
        नागपूर विभागीय आयुक्त यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संबोधित केले. त्यानंतर झालेल्या जिल्ह्यातील विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले ,चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
         कोरोना आजारावर केंद्र शासन राज्य शासनामार्फत संपूर्ण लॉकडाऊन केल्यानंतरही अनेक नागरिक त्याचे उल्लंघन करत आहे. अशा परिस्थितीत पाश्चिमात्य देशांमध्ये सुरुवातीच्या दुर्लक्षातून मोठ्या संख्येने अचानक रुग्ण वाढ झाली आहे. अशा वेळी हजारो लोकांवर एकाच वेळी उपचार करण्याची स्थिती निर्माण होते. अशावेळी सरकारी इस्पितळे यासोबतच खाजगी हॉटेलपासून तर खुल्या मैदानाची देखील मदत घ्यावी लागू शकते. त्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण विभाग स्तरावर सुरू करण्यात आलेले आहे. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात गडचिरोली व चंद्रपूर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होत आहे.जिल्हा प्रशासनाने अशावेळी महत्त्वाच्या जागा देखील बघून ठेवल्या आहेत.
       या बैठकीनंतर विभाग प्रमुख यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी कोणत्याही परिस्थितीत निराधार, निराश्रित, बेघर, विमनस्क लोकांना जेवणाची व निवासाची दुरावस्था होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले. यासोबतच त्यांनी जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातील जिल्ह्यातील जे नागरिक अडकून पडले असतील. विद्यार्थी, कर्मचारी ज्यांच्याकडे किचनची सुविधा नाही अशा सर्वांचीची व्यवस्था महानगरपालिकेच्या कम्युनिटी किचन मार्फत व शहरातील सामाजिक संस्थांमार्फत करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी महानगरपालिकेच्या ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र ही सुविधा निराधार, निराश्रित, विमनस्क  व बेघर लोकांसाठीच असून  त्याच लोकांनी याचा लाभ घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
       राज्याबाहेर तेलंगणामध्ये 929 तर आंध्रमध्ये 23 मजूर अडकून पडले आहेत या सर्वांना त्या-त्या जिल्ह्यांमध्ये खानदानाची व्यवस्था व निवाऱ्याची व्यवस्था करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आज पत्र देण्यात आले आहे या सोबतच जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातील 952 जणांची नोंद झाली आहे.
      जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये ज्यांच्याकडे स्वयंपाकाची व्यवस्था आहे, त्यांच्या रेशन कार्डवर त्यांना एक महिन्याचे अन्नधान्य वितरण जिल्हा हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे अन्नधान्य नसेल त्यांनी आपला रेशनवरील अन्नधान्य कोटा घेऊन जावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
     अन्नधान्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांना संचार बंदीच्या काळात परवाना पासेस देण्यासाठी उपप्रादेशिक अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ०७१७२-२७२५५५ हा दूरध्वनी क्रमांकावरून मदत घेण्याचे आव्हान उपप्रादेशिक अधिकारी विशंभर शिंदे यांनी केले आहे.
    जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही भाजीपाला, किराणा, अंडी, मांस ,तसेच हॉटेलचे किचन सुद्धा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. घरपोच सेवा तसेच पार्सल सुविधा प्रत्येक हॉटेलच्या किचनमधून उपलब्ध करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
     महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात बाहेर गावावरून नजीकच्या काळात आलेल्या नागरिकांचा शोध घेणे सुरू आहे. सोबतच जे नागरिक अन्य राज्यातून अन्य जिल्ह्यातून व अन्य ठिकाणावरून अडकून पडले असेल त्यांची देखील नोंद घेतली जात आहे. कोणाचीही उपासमार होऊ नये यासाठी प्रशासनाच्या सर्व यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
     दरम्यान वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये 28 मार्च रोजी विदेशात जाऊन आलेल्या नोंदणीकृत नागरिकांची संख्या १०९ आहे. सध्या निगराणीत असणारे नागरिक इक 43 आहेत 14 दिवसांच्या निगराणी कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या एकचा आहे इन्स्टिट्यूशन कॉरेन्टाईन करण्यात आलेले नागरिक ६ आहेत. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसून आतापर्यंतचे सर्व नमुने निगेटिव आले आहे.
     जिल्ह्याच्या रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा कमी असून रक्तदात्यांनी या काळामध्ये रक्तदान करावे व जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्त जमा होईल याकडे सर्व रक्तदात्यांनी लक्ष वेधावे असे आवाहनही जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments