गडचांदूरात नरेश टॉकीज येथे जुगारावर धाड, पत्रकारांना माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ !


राजकीय द्वेषापोटी कारवाई केल्याचा ठाकूरवार यांचा आरोप !

मला जुगार खेळता येत नाही ते साऱ्यांनाच माहित आहे. राजकीय द्वेषातून घडलेली घटना आहे. काही मुले "बीटफुल" हा पत्याचा गेम मनोरंजनासाठी खेळत होते. त्याची माहिती कोणीतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली व ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी जेवढे पैसे दाखविले हे माझ्या खिशातील होते. "प्रजेच्या सोबत राहण्याचे माझे धोरण राहिले आहे." राजकीय पक्षाने हाच डाव साधून ही खेळी खेळली असल्याचा आरोप नगरसेवक सागर ठाकुरवार यांनी प्रतिनिधींशी बोलतांना केला.

नगरसेवक सागर ठाकुरवार सह
अन्य आरोपींवर गुन्हा दाखल!
   चंद्रपूर : गडचांदूर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा शिवसेनेचे गटनेते सागर ठाकुरवार सह अन्य आरोपींना कालशुक्रवार  दिनांक 1 मे रोजी त्यांच्या मालकीच्या नरेश टाकीज येथे जुगार खेळतांना अटक करण्यात आली. दुपारी करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात पत्रकारांना माहिती देण्यास गडचांदूर पोलिसांनी केलेली टाळाटाळ शोभनिय नव्हती. सदर वृत्तासंबंधात गडचांदुर पोलिस स्टेशन डायरी अंमलदार यांना वारंवार विचारणा करून ही वृत्तासंबंधात माहिती मिळाली नाही. कारवाई सूरू आहे, हे रेटलेले उत्तर देण्यात येत होते. गडचांदुर चे पी.आय. गोपाल भारती यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही रात्रो उशिरापर्यंत सदर प्रतिनीधीला अधिकृत माहिती प्राप्त होऊ शकली नाही. एएसआय अन्सारी यांनी फार उशिरा अपूर्ण माहिती दिल्यामुळे वाचकांपर्यंत उशिरा वृत्त पोहोचत आहे. लागलेल्या संचारबंदी नुसार शासकीय अधिकाऱ्यांनी माहिती फोनवरचं उपलब्ध करून द्यावी, आगंतुकांना भेटण्याचे टाळावे, असे आदेश आहेत. वरिष्ठ अधिकारी त्यांच्या मोबाईलवर आलेले फोन उचलून समाधान करित असल्याचा अनूभव अनेकांनी घेतला आहे. रात्रो १० वाजता यासंदर्भात माहिती फक्त पो.नि. किंवा तपास अधिकारी अन्सारी यांचेकडून घेण्याचे सांगण्यात आले. 
  प्राप्त माहितीनुसार, ज्या ठिकाणी हा जुगार पकडण्यात त्याच्या आजुबाजुच्या परिसरात मोठा जुगार अड्डा चालविल्या जात असल्याची विश्वसनिय माहिती आहे. गडचांदूर शहरातील मोठे व्यावसायिक, शहरातील काँग्रेस,  भाजपा व शेतकरी संघटनेचे नेते, नगरसेवक,  व्यापारी सुद्धा याठिकाणी जुगार खेळण्यासाठी येत असल्यामुळे व गडचांदूर चे पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांची "खाओ और खाने दो" या वृत्तीमुळे सदर प्रकरणाची तक्रार वरिष्ठ स्तरावर करण्यात आली होती. परंतु या धाडसत्रात यातील मोठे मासे गळाला लागलेचं नाही. आपले बिंग तर फुटणार नाही नां, या भीतीनेच गडचांदूर पोलिसांनी सदर प्रकरण मीडियापर्यंत जाऊ न देण्याची खबरदारी बाळगली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार ह्यांच्या नेतृत्वात टाकलेल्या या धाडीत गडचांदूर नगर पालिकेतील शिवसेनेचे गटनेते सागर ठाकूरवार ह्यांना इतर 5 सहकाऱ्यांसह जुगार खेळतांना रंगेहात अटक करण्यात आली असुन खेळण्यासाठी वापरण्यात आलेले 52 पत्ते, 3300 रुपये रोख, 5 मोबाईल व 5 दुचाकींसह एकुण 165375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती नुसार,  गडचांदूर नगर पालिकेतील शिवसेनेचे गटनेते सागर ठाकुरवार, रतन नकुलवार, शंकर क्षीरसागर, गणेश सातपाळी, गणेश कोल्हे, राजेश महाडोळे हे सहाही लोक वॉर्ड क्रमांक 4 मधिल नरेश टॉकीजच्या वरच्या माळ्यावर असलेल्या खोलीत जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार ह्यांना मिळाली असता त्यांनी आपल्या चमूसह गडचांदूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक चौधरी, ए. एस आय अन्सारी, पोशी लिंगेवान ह्यांच्या सहकार्याने धाड घालुन पैसे लाऊन तीन पत्यांचा जुगार खेळत असताना रंगेहात अटक केली असुन त्यांच्याकडून एकुण 165375 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मुंबई जुगार कायदा कलम 4, 5 तसेच भांदवी च्या सहकलम 188, 269 (22) अन्वये संचारबंदी मोडणे, बेकायदा जमाव करणे ईत्यादी कायद्यान्वये कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गडचांदूर चे पो.नि. गोपाल भारती यांची भुमिका या प्रकरणात संशयास्पद!

घटना घडलेले स्थळ हे गडचांदुर पोलीस स्टेशनपासून जवळ  आहे. घटनास्थळावर जाण्यासाठी पोलिसांना फार परिश्रम घ्यावे लागत नाही. परंतु एवढ्या मोठ्या स्तरावर गडचांदूर सारख्या शहरांमध्ये मोठा व्यावसायिक जुगार होत असेल आणि त्याची माहिती लागूनच असलेल्या पोलीस स्टेशनला नाही ही गोष्ट अकल्पनीय आहे. गडचांदुर चे पीआय गोपाल भारती यांच्यावर विश्वास नसल्यामुळेच वरिष्ठ स्तरावरून ही कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा गडचांदूर मध्ये  सुरू आहे. मागील एक-दीड वर्षापासून गोपाल भारती गडचांदूर येथे कार्यरत आहेत. "सगळ्यातच आहे आणि कशातच नाही" अशी त्यांची गोडबोली प्रतिभा असल्याचे बोलले जाते. गडचांदुर मध्ये घडणाऱ्या प्रत्येक मोठ्या प्रकरणाच्या सोक्षमोक्ष लावण्यात ते पटाईत आहेत. नुकतीच दारू तस्करी ची एक मोठी घटना गडचांदुर परिसरात घडली. वणी तालुक्यातील कैलास नगर येथील दारू तस्करी करणाऱ्यांना गडचांदूर हद्दीत पकडण्यात आले. घडलेल्या या घटनेत फार मोठी "डेव्हलपमेंट" झाल्याची चर्चा गडचांदूरात आहे. गडचांदूरात घडलेली ही जुगाराची घटना भारती यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे.

Post a Comment

0 Comments