अतिसामान्य ते सामान्य ! सुधीरभाऊचा दमदार प्रवास !!




स्व. श्रीमती चांगुणाताई आणि समाजसेवी डॉक्टर श्री. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे ज्येष्ठ सुपूत्र सुधीरभाऊ यांचा जन्म ३० जुलै १९६२ ला ऐतिहासिक नगरी चंद्रपूर येथे झाला. आता मिडल एज क्रुसेडर असलेल्या सुधीरभाऊंत आता ही महाविद्यालयीन जीवनातील नव-तारूण्याचा खळखळाट आहे म्हणुनच ते अतिसामान्य ते असामान्य असा समाजाभिमूख राजकीय प्रवास राहिला आहे. कनिष्ठ बंधु डॉ. संदीप, गृहिणी श्रीमती सपना तिरूपती येथील तिरूपती बालाजी मंदिर ट्रस्ट च्या सदस्य तर सुकन्या शलाका एम.बी.बी.एस. डॉक्टर आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांच्या कुटुंबियांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असा हस्तक्षेप मुळीच नसतो, हे आत्ताच्या काळात अतिशय महत्वाचे आहे. चालता-बोलता संगणक, सातत्याने शिकण्याचा ध्यास, नम्रता, घराबाहेरील सर्वच लहान मोठी मंडळी आपले कुटुंबिय ही जन्मजात भावना आणि सोबत दुसऱ्याची रेष लहान करण्यापेक्षा आपली रेष आपल्या कर्तबगारीने मोठी करण्याची प्रवृत्ती, यामुळेच ते सर्वोत्कृष्ट सांसदपटू, इंडिया टुडे समुहाद्वारे देशातील सर्वोत्कृष्ठ अर्थमंत्री आणि लोकमत वृत्तपत्र समुहाद्वारे आश्वासक पुढारी ठरलेत. विरोधी पक्षाचे आमदार असतांना जळगांव येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे त्यांना अध्यक्ष घोषित करण्यात आले तेव्हा नारायणराव राणे यांनी विधानसभेत त्यांच्या अभिनंदनाचा सर्वसंमत ठराव मंजूर करून घेतला होता. देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वातील सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे सरकार आले, तेंव्हा मंत्रालयातील ज्येष्ठ-श्रेष्ठ आय.ए.एस. अधिकाऱ्यांनी त्यांचा शानदार निरोप समारंभ थाटात साजरा केला होता, असे क्षण दुर्मिळ आहेत. वनमंत्री असतांना त्यांनी चालविलेल्या वृक्ष लागवड अभियानाची महनीय व्यक्ती, राष्ट्रीय आणि जागतिक स्तराच्या प्रसारमाध्यमांनी आवर्जून त्यांच्या अभियानाची दखल घेतली होती, उद्योगपती रतन टाटा, योगगुरू बाबा रामदेव, अभिताभ बच्चन, विवेक ओबेरॉय, शिवसेना नेत्या श्रीमती निलम गो-हे यांना सुधीर आपला हक्काचा माणूस वाटतो आणि अतिमहनीय व्यक्ती, महनीय व्यक्ती प्रोटोकॉल (राजशिष्टाचार) टाळून त्यांना भेटतात तसेच वंचित, फाटका माणूसही त्यांना सहज भेटु शकतो आणि आपआपले प्रश्न मध्यस्थ किंवा दलाल यांचे मुळीच सहकार्य न घेता सोडवू शकतो हे जास्त महत्वाचे आहे. स्व. रामभाऊ म्हाळगी सारखे समाजभान, डॉ. वसंतकुमार पंडीत सारखा अफाट पत्रव्यवहार सुधीरच करूण जाणे ! साधे आमदार असतांना आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर त्यांनी केलेली विकासकामे बिनतोड आहे. चिचपल्ली येथील बांबु संशोधन केंद्र, चंद्रपुरातील सैनिकी शाळा, आदिवासी विद्याथ्यांचे माऊंट एव्हरेस्ट पर्वतारोहण-मिशन ऑलिम्पिक ही त्यापैकी काही ठळक उदाहरण आहेत. खासगी किंवा राजकीय कट्टर विरोधकांची कामे करून देण्यात सदैव तत्परता त्यांना आगळे-वेगळे ठरवून जातात. नागपूर विद्यापीठास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नामांतरण करणारे सकारात्मक उपद्व्याप त्यांचेच ! पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण करण्यात त्यांचाच पुढाकार होता. एवढेच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या निर्धन-निराधार वंशजांना आधार देण्याचे ही काम त्यांनी केले. मी सुधीरभाऊंचा भाट किंवा त्यांचा जनसंपर्क सांभाळणारा भोप्या नसून त्यांचा कठोर टीकाकार आहे. समाजकारण, राजकारण, पत्रकारिता, प्रबोधन क्षेत्रांत कार्यरत युवा पिढीने त्यांच्यापासून बोध घ्यावा हाच माझा एकमेत्व स्वार्थ आहे. माझे आश्वासक कौटुंबिक सदस्य असलेल्या सुधीरभाऊंना मी त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांनी मराठी-हिंदी वृत्तपत्र आणि नियतकालिकांत स्तंभलेखन आणि "दि हिन्दु" समुहाच्या फ्रंट लाईन सारख्या नियतकालिकात लेख लिहावेत अशी मागणी केली आहे. माझी मागणी ते पूर्ण करतील असा दृढ विश्वास आहे. सुधीर शुभेच्छा !



'भाऊनेच घडवलेली मंडळी !
देवराव भोंगळे, ब्रिजभुषण पाझारे, माजी महापौर अंजली घोटेकर, खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचर्लावार, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, श्रीमती शोभाताई फडणविस यांच्या शिष्यपुरूषोत्तमा चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती संध्याताई गुरनुले प्रभुतींची ओळख आणि पाठबळ सुधीर मुनगंटीवार यांचेच आहे. वर्धा येथील खासदार रामदास तडस आपल्या यशाचे श्रेय सुधीरलाच देतात. कुणी वंदा वा निंदा असा बंदा म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार !


एन काऊंटर आणि स्पीड पोस्ट !
एकेकाळी यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांच्यासारखी अनेक मंडळी पश्चिम महाराष्ट्रात माजी काँग्रेस आमदार अॅड. एकनाथराव साळवे यांना निरनिराळ्या विषयावरील व्याख्यानासाठी आग्रहाने निमंत्रित करायचे. माजी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचे नक्षलवाद्यांनी अतिचर्चित अपहरण केले, तेंव्हा शरद पवार यांच्या आग्रहामुळे मध्यस्थी करून नक्षलवाद्यांच्या तावडीतुन धर्मरावबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सुटका करवली होती. त्यानंतर पवारांनी धर्मरावबाबांना राज्यमंत्रीपद दिले होते. नक्षलवाद्यांचे हस्तक असा अँड. साळवे यांच्यावर आरोप लावून त्यांना खूप छळले होते. चंद्रपूर च्या माजी (साळवे) काँग्रेस आमदाराची चांदा जिल्ह्यात फार उपेक्षा झाली.
आष्टी (पेपर मिल) येथे त्यांनी १७/१/२००९ ला मला त्यांची ‘एन काऊंटर' ही कादंबरी स्व-हस्ताक्षरात भेट दिली होती, ती हा स्तंभ लिहीण्यापुर्वी परत एकदा वाचली. नक्षलवादी अभ्यासक म्हणून ज्या दुफळीचा उदो-उदो केला जातो ती अँड. साळवे यांच्यापुढे किस झाड की पत्ती ? श्री पेज वरील अग्रणी नांव थ्री पेज गाजविणाऱ्या श्रीमती शोभा डे यांचे 'स्पीड पोस्ट' हे हादरवून सोडणारे कौटुंबिक ओलाव्याची सतत जाणीव देणारे पुस्तक नुकतेच वाचून पूर्ण केले. नव्या-जुन्या पिढीतील समंजस व्यक्तींनी स्पीड पोस्ट' वाचायलाच पाहिजे. पालक-पाल्य यांच्यासाठी ते बोधप्रद आहे.



बाजार बुणग्यांचा उदोउदो !
कर्तबगारांची मात्र उपेक्षा !!
चंद्रपूरात वेळी-अवेळी अनेक बाजारबुणगे, स्वप्रसिद्धीचे ढोल बडविण्यात महावस्ताद व्यक्तींचे भरपूर सत्कार सोहळे झाले आहेत. सुप्रसिद्ध कार्टूनिस्ट (व्यंग चित्रकार), लेखक, पत्रकार, वुडन आर्ट मध्ये महारत असलेले मनोहर सप्रे, उर्दू साहित्य-प्रसार माध्यम-भारतीय संस्कृती, हिंदु धर्माच्या गाड्या अभ्यासक डॉ. रमा गोळवलकर, चित्रकलेतील-झाडीपट्टी रंगभुमीवरून अग्रणी प्राचार्य सदानंद बोरकर (नवरगांव), इतिहासाचे गाढे अभ्यासक श्रद्धेय दत्ताजी तत्रीरवार मात्र चांदा जिल्ह्यात उपेक्षित राहिले आहेत. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, अजयभाऊ धवने यांना या कर्तबगार दिग्गजांचा सार्थ सन्मान करण्याचे सुचु नये हे तर खूपच झाले.


-सुरेश धोपटे, वर्धा

Post a Comment

0 Comments