चंद्रपूर येथून केली होती आंतराष्ट्रीय तस्कर संचारचंद च्या साथीदारांना अटक ! The accomplices of the international smuggler Sanchar Chand were arrested from Chandrapur!



आंतरराष्ट्रीय कुख्यात तस्कर संचारचंद याच्यासाठी वाघ आणि इतर वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या केरू राजगोंड आणि त्याच्या भावाला सीबीआय आणि वाइल्ड लाइफ कण्ट्रोलच्या अधिकाऱ्यांनी १८ नोव्हेंबर २००९ रोजी मध्यरात्री छापा टाकून बल्लारपूर मार्गावर अटक केली होती. छाप्याच्या वेळी या दोघांच्या बायका पळून जाण्यात यशस्वी झाल्या.विदर्भातील सर्वाधिक (त्यावेळी ९०) वाघ असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात संचारचंद नावाच्या आंतरराष्ट्रीय तस्कराची टोळी सक्रीय होती. वाघ आणि वन्यप्राण्यांची शिकार करायची आणि रेल्वेतून वाघांचे अवयव, कातडे दिल्लीला पोहोचवायचे काम त्याच्या टोळीतील शिकारी करत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संपर्कक्रांती एक्सप्रेसमध्ये या टोळीतील सात जणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीच्यावेळी तासी सेरिंग उर्फ बाबू याच्या मोबाइलची तपासणी केली असता तो चंद्रपूर जिल्ह्यातील काही लोकांच्या संपर्कात असल्याचे लक्षात आले. सीबीआयचे अधिकारी माधवन आणि वाइल्ड लाइफ कण्ट्रोल ब्यूरो मुंबईच्या अधिकारी तेजस्विनी पाटील चंद्रपूर ला दाखल होत सेरिंगच्या मोबाईलवर बल्लारपूर मार्गावरून नियमित फोन येत, अशी माहिती हाती येताच या पथकाने येथील झोपडपट्टीत चौकशी सुरू केली. चौकशीअंती मध्य प्रदेशातील कटनी येथील दोन कुटुंबे येथे राहत असल्याची माहिती मिळाली. कुटुंबातील सर्वजण झोपेत असतानाच पथकाने धाड टाकून केरू राजगोंड आणि त्याच्या भावाला ताब्यात घेतले होते. सुरुवातीला तस्करीत सहभागी नसल्याचे सांगितले, मात्र नंतर गुन्हा कबूल केला.  जंगलात शिकार करून हे दोघे वाघ आणि अन्य प्राण्यांचे अवयव, कातडे रेल्वेमधून दिल्लीला पाठवत असत. यांच्यासारखेच आणखी पाच-सहाजण या भागात असल्याची माहिती होती. जुनोना, गोंडपिंपरी आणि बल्लारपूर वन क्षेत्रातून तीन वाघिणी अचानक बेपत्ता झाल्या असून, यातही या दोघांचा हात असल्याचे बोलल्या जात होते. मध्य रेल्वेचे शेवटचे रेल्वेस्थानक असलेल्या बल्लारपूर येथून आंध्र प्रदेश व दिल्ली येथे जाण्यासाठी गाड्या सहज उपलब्ध होतात. त्यामुळेच बल्लारपूर रेल्वेस्थानक तस्करीचे केंद्र बनले असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
आंतरराष्ट्रीय तस्कर रणजितसिंग ला अटक व सात वर्ष सक्ती मजुरीची शिक्षा !
कुख्यात आंतरराष्ट्रीय तस्कर संसारचंदचा उजवा हात असलेला रणजितसिंग याला २०१३ ला महाराष्ट्र वनविभागाने अटक केली होती. त्याच्या अटकेमुळे व्याघ्र तस्करांचे नेटवर्क हादरले होते. मेळघाटातील ढाकणा येथे मारलेल्या वाघाच्या तस्करी खटल्यात १० डिसेंबर २०१५ ला अमरावती प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन आरोपींना प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. वाघ तस्करी खटल्यात इतकी मोठी शिक्षा देण्याची ही देशातील-राज्यातील पहिलीच घटना आहे. रणजित बावरिया, सरजू बावरिया आणि दलबीर बावरिया अशी या तीन आरोपींची नावे आहेत. या खटल्यात १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. याआधीच्या प्रकरणांमध्ये ४ आरोपींना प्रत्येकी ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. आरोपींपैकी रणजित व दलबीर हे मध्यस्थ म्हणून काम करीत होते व त्यांनी शिकारीसाठी आगाऊ रक्कम दिली होती. शिकारीनंतर त्याने वाघाची कातडी व हाडे एकूण १.६५ लाख रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर, सरजूने हे साहित्य खरेदी केले व ते सूरजपाल ऊर्फ चाचा या आरोपीला विकले. सूरजपाल हा तिहार तुरुंगात शिक्षा भोगत होता. रणजित हा आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्कर होता. त्याच्यावर सीबीआयनेदेखील २००९ मध्ये गुन्हे दाखल केले होते. मेळघाट सायबर सेलने आंध प्रदेशातील विजयनग्राम जिल्ह्यातील गोलुकोंडा गावातून स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने सीबीआयचा आरोपी असलेला रणजितसिंग भाटियाला अटक केली. वाघाच्या शिकार प्रकरणात संसारचंद तिहार जेलमध्ये गेल्यानंतर णजितसिंगने सारी सूत्रे आपल्या हाती घेतली होती. रणजितसिंग अनेक वर्षापासुन सीबीआयला हुलकावणी देत होता. चंद्रपूर येथे दोन वाघांच्या शिकार प्रकरणात सीबीआयने त्याला अटक केली होती. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली, पण तेव्हापासून एकाही सुनावणीला तो हजर नव्हता. त्यामुळे सीबीआयने त्याला फरार घोषित केले. जामिनावर सुटल्यानंतरही त्याने वाघांच्या शिकारी सुरुच ठेवल्या. या कामात त्याला केरू आणि अजितची मदत होती. नागपूर परिक्षेत्राअंतर्गत दोन प्रकरणात व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा वाघ शिकार प्रकरणातील प्रमुख आरोपी होता. मेळघाटमध्ये रणजितसिंग चे मोठे नेटवर्क होते आणि ज्या गावात त्याने मुक्काम ठोकून शिकारी केल्या, त्या गावातील लोकही त्याला ओळखत होते. सरजू आणि दलबीर हे वाघ तस्करीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये सहभागी असलेले आरोपी आहेत. रणजित याला विशाखापट्टणम येथून तर सरजू आणि दलबीर यांना दिल्ली आणि हरियाणा येथून अटक करण्यात आली होती. या तीनही आरोपींचे कृत्य हे देशातील पर्यावरणाला गंभीर धोका पोचविणारे असल्याचे कोर्टाने नमूद केले. या तीनही आरोपींना त्यांनी प्रत्येकी सात वर्षाची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड ठोठावला आहे.
तंत्रज्ञानाने सोडविले होते रहस्य : ढाकणा प्रकरणापासूनच देशपातळीवरील व्याघ्र तस्करीचे धागेदारे उलगडू लागले होते व नंतर सीबीआयकडे ती प्रकरणे सोपविण्यात आली. ढाकणा प्रकरणात कोणताही प्रत्यक्ष पुरावा किंवा जप्ती केलेले साहित्य नव्हते. आरोपींच्या दूरध्वनी कॉल्सचा पाठपुरावा करीत व सीडीआर माहितीच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यात आला. आरोपींच्या कबुलीजबाबांचे चित्रीकरण देखील करण्यात आले होते. संपूर्ण इलेक्ट्रॉनिक पुरावे वन विभागाच्या वतीने सादर करण्यात आले होते. या प्रकरणानंतर तस्करीच्या ११ प्रकरणाचा उलगडा झाला होता. या प्रकरणात इतकी मोठी शिक्षा होणे हा महत्वपूर्ण निर्णय ठरला.

भंडारा पोलिसांच्या तावडीतून पळालेला ५० वाघांची शिकार करणारा तस्कर कुट्टू! 

वाघांची शिकार करणारा आंतरराष्ट्रीय तस्कर कुट्टू भंडारा येथून २७ जानेवारी २०१६ रोजी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. कुट्टूने भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात ५ वाघांची शिकार केल्याची कबुली दिली होती. मध्य भारतात त्यानं तब्बल ५० वाघांची शिकार केल्याचा आरोप होता. सीबीआय आणि वन्यविभागानं त्याला २०१५ मार्चमध्ये मध्य प्रदेशातल्या कटनी जिल्ह्यातून अटक केली होती. त्याची चौकशी झाल्यानंतर सीबीआयनं राज्याच्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन विभागाकडे त्याला सोपवलं. तो भंडाऱ्याच्या मध्यवर्ती तुरुंगात होता. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा इथं कोर्टातल्या तारखेसाठी २ पोलीस त्याला बसमधून घेऊन जात होते. त्यावेळी लाखांदूर तालुक्यात दिघोरीजवळ टॉयलेटला जाण्यासाठी उतरला आणि पोलिसांच्या तावडीतून पळाला.



कोण हा कट्टू ? : कुट्टू छेलाल पारधी (२८) रा. गिरोली जि. कटनी मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या कुट्टू वर वाघ आणि इतर वन्यप्राण्यांची शिकार करुन त्याच्या अवयवांची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी केल्याचा त्याचेवर आरोप होता. अटकेपर्यंत त्याचेवर पन्नास वाघांची हत्या केलाचा संशय होता. त्याला सीबीआय आणि वाईल्ड लाईफ क्राईम ब्रांचने ३ मार्च २०१५ मध्ये अटक केली. कटनी येथुन त्याच्या टोळीतल्या ४६ जणांना तोपावेतो वनखात्याने अटक केली होती. नागझिरा अभयारण्यामध्ये असलेला राष्ट्रपती नावाचा वाघ तसेच अल्फा नावाची वाघीण २०१३ जानेवरीपासुन बेपत्ता होती कुट्टूनेच त्यांची हत्या केल्याचा संशय होता.
(साभार)

Post a Comment

0 Comments