प्रथम थोर पुरूषांचा अपमान व नंतर माफी, मुख्याधिकाऱ्यांची ही "गजब" तऱ्हा !



  • गडचांदूर च्या मुख्याधिकारी मंथन व चिंतनाचा विषय !
  • पदाचा दुरूपयोग करून सत्ताधाऱ्यांनी कामे लाटल्याचा विरोधकांचा आरोप !
  • भ्रष्टाचाराने माखलेली गडचांदूर न.प. !
  • चौकशी समितीमध्ये गडचांदूर न.प. तील अधिकाऱ्यांना बाजूला ठेवा !

गडचांदूर : गडचांदूर न.प. मध्ये गुरुवार दि. १५ ऑक्टोबर रोजी न.प. ची आमसभा आयोजित करण्यात आली होती. या आमसभेमध्ये एकंदर १६ विषय "विषय सुची" मध्ये होते. यामध्ये विषय क्र. ४ नुसार गडचांदूर शहरातील महात्मा गांधी चौक, शिवाजी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे बाजुचे तसेच शेडमाके चौक, संविधान चौक, राजीव गांधी चौक, संताजी चौक, महात्मा फुले चौक' या चौकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करणे बाबत चर्चा होणार होती. श्रद्धास्थान व आधारस्थान असलेल्या प्रेरणादायी महापुरुषांचा "विषयसुची" मध्ये एकेरी उल्लेख करण्यात आला होता. यावर या आमसभेमध्ये विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सागर ठाकुरवार, धनंजय छाजेड यांनी आक्षेप घेतल्यानंतर गडचांदूर न.प. च्या मुख्याधिकाऱ्यांनी या संदर्भात सभागृहामध्ये माफी मागून अनावधनाने ही चुक घडली असल्याचे कबुल केले. गडचांदूर न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांसाठी ही बाब नबिन नाही, ही त्यांची नेहमीचीचं "तऱ्हा" आहे. यापुर्वी ही त्यांनी गडचांदूर च्या प्रतिष्ठीत, वरिष्ठ नागरिक, पत्रकार यांचा अपमान केला आहे. त्याविषयी तक्रारी ही दाखल झाल्या आहेत. गडचांदूरच्या मुख्याधिकारी डा गडचांदूरकरांसाठी सत्ताधारी-विरोधकांसाठी डोकेदुखी ठरल्या आहेत. पुर्वी चुका करायच्या, आगपाखड करायची, अधिकारी असल्याचा आव आणायचा हा त्यांचा नेहमीचा "खाक्या" आहे. यावेळी पहिल्यांदाच त्यांनी सभागृहात माफी मागितली आहे, हे विशेष !

गडचांदूर च्या मुख्याधिकारी मंथन व चिंतनाचा विषय !

अल्पावधीच्या गडचांदूर नगर परिषदेच्या स्थापनेनंतर विजयकुमार सरनाईक, बल्लाळ, ढोके व जाधव साहेब यांच्या रूपाने प्रभारी मुख्याधिकारी या न.प. ला लाभले. डॉ. विशाखा शेळकी यांच्या रूपाने गडचांदूर ला पुर्ण वेळ मिळालेले एकमेव मुख्याधिकारी आहेत. मागील दोन ते अडीच वर्षापासून त्या या न.प.ला कार्यरत आहेत. मनमर्जी करणाऱ्या, जिद्दी, हुकूमशाही प्रवृत्तीच्या मुख्याधिकारी अशी त्यांनी याठिकाणी आपली ओळख निर्माण केली आहे. कुणाचे ही ऐकायचे नाही, "हम को सो कायदा!" अश्या त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीमुळे न. प. मधील भ्रष्ट कर्मचारी-अधिकारी यांच्या त्या जवळच्या झाल्यात परंतु गडचांदूवासीयांपासून त्या दुरावल्या. त्यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यात त्यांच्या अधिनस्त कर्मचारी हे यशस्वी ठरले. परंतु त्याचे काहीही देणे-घेणे मुख्याधिकाऱ्यांना राहिले नाही. मी व माझे (भ्रष्ट (?)) कर्मचारी अश्या मिलीभगतीमुळेचं घनकचऱ्याच्या कंत्राटासारखे अनेक भ्रष्टाचार या न. प. मध्ये त्यांच्या कार्यकाळात घडले आहेत. त्यावर कुणी आवाज बुलंद करण्याच्या प्रयत्न केला तर मुख्याधिकाऱ्यांना ती बाब "जिव्हारी" लागायची. परंतु सत्य काय ? याची पडताळणी करण्याचे धाडस त्यांनी आजपावेतो दाखविले नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या उर्मटपणाच्या अनेक तक्रारी वरिष्ठांना पुराव्यानिशी प्राप्त झाल्या परंतू त्यावर कोविड-१९ चे "लेपण" लावून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी गडचांदूर न.प. समोर भ्रष्टाचाराच्या विरोधात अन्नत्याग आंदोलन झाले, परंतु त्याचे काहीही सोयरसुतक मुख्याधिकाऱ्यांना नाही, असे आज तरी दिसत आहे. गडचांदूरातील वरिष्ठ नागरिक, पत्रकार, ज्येष्ठ सदस्य, सत्ताधारी व विरोधकांचा अपमान त्यांनी अनेक वेळा केला आहे. आपणचं गडचांदूर चे "राजे" आहोत, असा बहुतेक त्यांना "भ्रम" निर्माण झाला असेल. त्यावर त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.

पदाचा दुरूपयोग करून सत्ताधाऱ्यांनी कामे लाटल्याचा विरोधकांचा आरोप !

नुकत्याच १५ ऑक्टोंबर रोजी झालेल्या आमसभेमध्ये १६ कामांना मंजुर देण्यात आली. यातील काही नाली व रोडचे काप सत्ताधाऱ्यांनी पदाचा दुरूपयोग करून आपले नातेवाईक व परिचितांना मिळवून दिल्याचा खळबळजनक आरोप वृत्तांच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. सत्ताधारी पक्ष आता गडचांदूर मध्ये आपल्या हितचिंतकांना कंत्राटी कामामध्ये उतरवून "मलाई लाटत" असल्याचा गंभीर आरोप विरोधक करीत आहे. अश्याच एका निविदेमध्ये "मी ई-निविदा प्रक्रियेतून माघार घेत असल्याचे पत्र न.प.ला आणून दिले" या कंत्राटांमध्ये घोळ असल्याचा आरोप वृत्तांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. त्यावर गडचांदूर न.प. प्रशासनाने योग्य ती चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आता गडचांदूर मध्ये होत आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, गडचांदूर च्या मुख्याधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने एका अभियंत्यांच्या नातेवाईकाने ही कामे आपल्या "पल्ल्यात" पाडून घेतली आहेत, अशी चर्चा आज गडचांदूर मध्ये सुरू आहे. गडचांदूर चा हा अभियंता अनेक प्रकरणात गोवला असून त्याच्यावर मुख्याधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याचे बोलल्या जात आहे. घनकचऱ्याच्या कंत्राटाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या समितीने या अभियंत्यांच्या व त्याला आशिर्वाद प्राप्त असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी केल्यास अनेक "काळे-भेरे" गडचांदूर मधूनचं बाहेर येवू शकतात. घनकचरा भ्रष्टाचाराच्या "वाटाघाटीत" हा अभियंता मुख्य भुमिकेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार "त्याच" घनकचरा कंत्राटदाराचे आणखी पाच ते सहा कंत्राट याच अभियंत्याचा निदर्शनास खाली सुरू आहे. त्यामुळे घनकचरा कंत्राटदाराच्या विशेष "खानसामा" म्हणून या अभिनेत्याची ओळख निर्माण झाली आहे. सध्या गडचांदूर न.प. मधील या अभियंत्यांनी लाखोची "माया" गडचांदूर मधून जमबवली असल्याचे बोलल्या जाते.

भ्रष्टाचाराने माखलेली गडचांदूर न.प. !


काही महिन्यांपासून गडचांदूर मधील घनकचरा कंत्राटातील भ्रष्टाचाराचे प्रकरण गाजत आहे. येणाऱ्या काही महिन्यामध्ये पाणी पुरवठा विभागातील मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता याठिकाणी नाकारता येत नाही. या पाणी पुरवठ्याच्या कामामध्ये ही "तोच अभियंता" मुख्य भुमिकेत असल्याचे सांगण्यात येते.
नुकत्याच झालेल्या गडचांदूर न.प. च्या आमसभेत घनकचरा कंत्राटाला "विषय सुची" मधून जाणिवपूर्वक डावलण्यात आले. विरोधी पक्षाने ही या आमसभेमध्ये घनकचरा कंत्राटावर कोणतीही आक्रमक भुमिका घेतली नाही. शिवसेना-युतीचे ५+१=६ व धनंजय छाजेड च्या रूपाने असलेले शिवसेनेचे असलेले स्विकृत सदस्य असे ७ नगरसेवक शिवसेना तर २ भाजप असे एकंदर ९ सदस्य गडचांदूर न.प. मध्ये विरोधकांच्या भूमिकेत आहे. घनकचरा कंत्राटाच्या भ्रष्टाचाराविरोधात ६ दिवस चाललेल्या भिम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांच्या आंदोलनात विरोधी पक्षाने समर्थनार्थ एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले होते, मोठ्या प्रमाणात असलेल्या विरोधी पक्षाने आमसभेमध्ये घनकचरा कंत्राटावर चर्चा घडवून आणली नाही ? हा संशोधनाचा विषय आहे. गडचांदूरकरांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असल्याचा स्पष्ट आरोप सत्ताधारी आता करीत आहे.

चौकशी समितीमध्ये गडचांदूर न.प. तील अधिकाऱ्यांना बाजूला ठेवा !


भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष आयु.  मदन बोरकर यांच्या उपोषणानंतर घनकचरा कंत्राटाच्या भ्रष्टाचाराविरोधात राजुराचे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे. या चौकशी मध्ये भ्रष्टाचाराशी संबंधित कागदपत्रांची छेडछाड होवू नये याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने गडचांदूर न.प. च्या कर्मचारी-अधिकारी यांना बाजूला सारून अन्य ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या चौकशीमध्ये स्थान देण्यात यावे, कंत्राटदारांकडे प्रारंभापासून कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन अन्य बाबीसंबंधात कंत्राटी कामगारांच्या बयाणाला प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर चे माननिय जिल्हाधिकारी साहेब यांचेकडे करण्यात आली असून या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी झाल्यास कंत्राटदारांला मोठा दंड आकारला जाऊ शकतो व त्याला काळ्या यादीत टाकण्यात येवून न.प. ती भ्रष्टाचारी कर्मचारी-अधिकारी यांचेवर ही गाज कोसळू शकते अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. गडचांदूर मधील घनकचरा कंत्राटाच्या भ्रष्टाचाराची सखोल व निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी होत असतांनाचा गडचांदूर न.प. मधील पाणी पुरवठा विभागातील भ्रष्टाचार ही येणाऱ्या काही दिवसामध्ये चव्हाट्यावर येऊ शकतो, अशी चर्चा गडचांदूर मध्ये सुरू आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातील काही भ्रष्ट समाजसेवक व न.प. तील भ्रष्ट कर्मचारी-अधिकारी यांचे या घोटाळ्यात पुर्णपणे हात माखले असल्याची चर्चा होत आहे.

Post a Comment

0 Comments