चंद्रपूर सह अन्य जिल्ह्यातील पक्ष्यांना बर्ड फ्ल्यु !




  • १ कि.मी. अंतरावरील कोंबड्या मारण्याचा सरकारचा निर्णय !
  • चंद्रपूरातील कोंबड्या ही चाचणीत संसर्गजन्य !
  • राज्यात हायअलर्ट घोषित करणे गरजेचे-आरोग्यमंत्री

चंद्रपूर (प्रति.)
राज्यातील चंद्रपूर सह मुंबई, ठाणे, परभणी, दापोली, बिड, अकोला, लातुर, गोंदिया या भागातील पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्ल्यु संसर्ग पॉझिटिव्ह आढळले असून सोमवार (दि. ११) रोजी या भागातील पक्ष्यांच्या चाचणीत ही बाब समोर आली आहे. राज्यातील १२०५ पक्ष्यांना ‘बर्ड फ्लु' ची लागण झाली असून यापैकी १ हजार कोंबड्या बर्ड फ्ल्यु मुळे मृत्यूमुखी पडल्या असतांना या रोगाचा संसर्ग झालेल्या एक किलोमिटर च्या परिसरातील कोंबड्या आज मंगळवार (दि.१२) पासून मारण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासंदर्भात पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आहे. आणखी काही ठिकाणचे नमुने भोपाळ येथे चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
मरण पावलेल्या कोंबड्या, बगळे आणि कावळे यांनी एच-१ एन-१ या विषाणूचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. अन्य ठिकाणी मरण पावलेल्या पक्षांचा चाचणी अहवाल भोपाळ येथून येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवार पर्यंत चंद्रपूर २, परभणी ८४३, लातूर २४०, बीड ११, ठाणे २०, रत्नागिरी ९, अकोला १, गोंदिया २, नागपूर ४५, अमरावती ३०, नाशिक २ अशी मृत पावलेल्या पक्ष्यांची संख्या होती. अजुन काही पक्ष्यांचे नमुने चाचणीसाठी भोपाळ येथे पाठविले असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी सायंकाळी घेवून राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी या संबंधात संवाद साधला. बर्ड फ्ल्यु ला अटकाव करण्यासाठी अलर्ट मोडवर राहुन काम करा अशा सुचना ही देण्यात आल्या आहेत. या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर ३ ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले. तसेच अफवा व चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी पशू व दुग्धविकास विभागाला दिले आहेत.

राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव-आरोग्यमंत्री टोपे



बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषित करणे गरजेचे असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. जालना येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्ल्यूने थैमान घातले असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे या आजाराने मृत्यूमुखी पडले आहेत. सुरुवातीला पक्षांमध्ये संसर्ग होणान्या या आजाराचा मानवी शरिरातही संसर्ग होतो. या आजाराचा मृत्यू दर हा १० ते १२ टक्के आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट घोषीत करणे गरजेचे आहे, असे टोपे यांनी म्हटले आहे.
परभणी जिल्ह्यात मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूमुळे ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. मृत कोंबड्या एका पोल्ट्री फार्ममधील आहेत. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी इतर कोंबड्यांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याचे महाराष्ट्र देशातील आठवे राज्य बनले आहे. राज्यात बर्ड फ्ल्यूची प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत या आजाराची तीव्रता आणि एकूण परिस्थिती समोर येईल.

Post a Comment

0 Comments